होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन हा सण साजरा केला जातो. या सणाला धुळवड असेही बोलले जाते. महाराष्ट्रात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला हा सण साजरा करतात. होलीका दहनाची राख या दिवशी परंपरेप्रमाणे एकमेकांना लावतात.
होळी सण हा हिंदू दिनदर्शिकेनुसार (According to Hindu calendar) महिन्यातील शेवटचा असतो. होळी (Holi) पेटवून धुलीवंदनाच्या दिवशी मातीला,जमिनीला नमस्कार करण्याची प्रथा आहे. प्रत्येक प्राणी मात्राचा देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला असतो. पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश. (Earth, Water, Fire, Air, Space) असा या पंचमहाभूतांचा क्रम आहे. धूलिवंदन म्हणजे पृथ्वी पासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या मधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस . यादिवशी पृथ्वीला वंदन केले जाते. त्यानंतर १५ दिवसांनी नववर्षाची म्हणजे पाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे.
घरातील बायका या दिवशी सकाळी पाण्याची घागरी, हंडे पाण्याने भरुन होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात. या पाण्याने अंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही असे मानले जाते. या दिवसात कै-याही मिळू लागतात. मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावतात. कै-या उकडून त्याचा गर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात.
आजकाल काही ठिकाणी लोकांनी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आपापल्या सोयीनुसार होळीच्या दुस-या दिवशी सुरु केली आहे. त्यात स्त्रिया-पुरुष सरसकट लहान-मोठे, सगळे उत्साहाने सहभागी होतात व रंग खेळतात. रंगपंचमी हा एक वेगळाच आनंदी सण आहे.